PM Vishwakarma Yojana : देशातील कुशल कारागिरांना केंद्र सरकारनं मोठी बातमी दिली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना आता केवळ ५ टक्के व्याजदरात कर्ज मिळणार आहे. केंद्र सरकार या कर्जावर तब्बल ८ टक्क्यांपर्यंत सबसिडी देणार आहे. त्यामुळं कर्जाची गरज असलेल्या कुशल कारागिरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, गवंडी, कुंभार, टाळे बनविणारे, दगडी शिल्पकार, नाभिक, मासेमारीची जाळी बनविणारे आणि लाकडी होड्या बनवणाऱ्यांसह १८ कामांमध्ये गुंतलेल्या कुशल कारागिरांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतीच पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. एखाद्या कुशल कारागिराला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्याला भांडवल उभं करायला अडचण येतेय, अशा व्यक्तीला पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे.
या योजनेमध्ये आर्थिक मदतीसोबतच आगाऊ कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचं अद्ययावत ज्ञान, डिजिटल पेमेंट, जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेशी जोडून घेण्यासाठी मदत आणि उत्पादनांचं ब्रँडिंग अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत.