गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी आपला सार्वजनिक बांधकाम विभाग दिवसरात्र काम करत आहे. त्यामुळेच कशेडी टनेल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असून, या बोगद्यामुळे रत्नागिरीतील कशेडी ते पोलादपूरमधील भोगाव हे एका तासाचे अंतर दहा मिनिटांत पार करता येईल.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट हा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षात नागमोडी वळणाच्या या घाटामध्ये अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. या घाटामध्ये काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित झालेले आहेत. हा घाट पूर्ण करण्यासाठी जवळपास ४५ ते ६० मिनिटांचा कालावधी लागतो यासाठी नागमोडी वळणाच्या या मार्गाला पर्यायी म्हणून या घाटाचा सर्वे करण्यात आला होता. सर्वे केल्यानंतर पर्यायी घाटमाथावरच्या सध्या स्थितीत असलेल्या चालू रस्त्याच्या खाली बोगदा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले होते.