भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज
सत्यात उतरला. भारताचं हे चांद्रयान आज
संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरलं. विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट
लँडिंग केलं. अलिकडेच रशियाने लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या
पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि रशियाची मोहीम अपयशी ठरली.
त्यापाठोपाठ भारताची चांद्रयान मोहीम सुरू होती. भारताच्या मोहिमेबद्दल लोकांच्या
मनात धाकधूक होती. परंतु, ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास
इस्रोने व्यक्त केला होता. आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत
असं वैज्ञानिकांनी म्हटलं होतं. भारताचे शास्त्रज्ञ त्यांच्यावर दाखवलेल्या
विश्वासावर खरे उतरले आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयानाचं चंद्रावर
यशस्वी लँडिंग केलं आहे. भारतीय संतराळ संशोधन
संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ ने आज मोठे यश
मिळवले.
२०१९ साली
भारताच्या चांद्रयान-२ या मोहिमेत अंतिम क्षणी अपयश आल्याने इस्त्रोसह देशवासियांची
निराशा झाली होती. मात्र या अपयशाने खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अधिक
जोमाने प्रयत्न करतचांद्रयान-३ मोहिमेची आखणी केली होती.
दरम्यान, १४ जुलै
२०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर
एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज
संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या
पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला.
त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा
भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान
उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.
चांद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह इस्रोच्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढच्या काळात भारत गगनयान, आदित्य-१ या मोहिमांसह शुक्र ग्रहावरील मोहिमांचेही सुतोवाच केले.