दहीहंडीसंदर्भात महत्त्वाची बातमी बातमी आहे. यंदाच्या वर्षीपासून महाराष्ट्रात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती.
राज्य सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे नुकतंच एक परिपत्रक जारी करुन राज्यातील 50 हजार गोविंदांना विम्याचं कवच देण्यात आलं आहे. 50 हजार गोविंदांचा विमा उतरवण्यासाठी 37 लाख 50 हजार देण्यात आले आहेत. तर राज्य सरकारने ठरवल्याप्रमाणे यंदापासून प्रो-लीग गोविंदा स्पर्धाही होणार आहे.
दहिहंडी उत्सवादरम्यान गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना आणि त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतं. या अनुषंगाने गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 50 हजार गोविंदांना प्रति गोविंदा रु. 75 चा विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु. 37,50,000 इतका निधी संबंधित विमा कंपनीस अदा करण्यात आला आहे. मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.
2014 पासून प्रो-लीग गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार अशी मागणी होती, ती यंदा पूर्ण होत आहे. वरळी येथे डोम थिएटरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी मुंबई येथील वरळीच्या डोम या ऑडिटोरियममध्ये "प्रो-गोविंदा" स्पर्धेचं आयोजन राज्य समन्वय समितीद्वारा करण्यात येणार आहे, या समितीस शासनाने मान्यता दिली आहे.