● मुंबई-गोवा महामार्गासाठीकोकणवासीयांचा एल्गार
● ५ सप्टेंबरपासून मानवी साखळीद्वारे जनआंदोलन
● 'समृद्ध कोकण संघटना' आणि 'कोकण महामार्ग समन्वय समिती'चा पुढाकार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन १२ वर्षे उलटली असताना अद्यापही त्याचे काम रखडले आहे. या संथ कामाचा निषेध करत कोकणवासीयांनी एल्गार पुकारला असून ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान जनआंदोलन होईल. महामार्ग बनवणाऱ्या यंत्रणेविरुद्ध निदर्शन करत काळी फित लावून मानवी साखळीच्या माध्यमातून पोलादपूर, चिपळूण, संगमेश्वर, सिंधुदुर्ग, पनवेल आणि पळस्पे येथे सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान आंदोलन करण्यात येईल. समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी जागा विकत घेऊन तो चार वर्षात पूर्ण झाला. महाराष्ट्रातील आदी अनेक महामार्ग प्रकल्पांचे काम पूर्ण झाले. त्या त्या प्रकल्पांमागे राजकीय इच्छाशक्ती दिसते पण ती कोकण महामार्गासाठी दिसत नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना खड्डेमय महामार्गावरून हाल सहन करत गावी पोहोचावे लागणार आहे. ''दर्जेदार महामार्गाचे स्पप्न दाखवत प्रत्यक्ष मात्र महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या दुरावस्थेला वाचा फोडण्यासाठी कोकणातील अनेक संघटना एकवटल्या आहेत.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता शांततामय मार्गात हे आंदोलन करण्यात येत असून गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी काळ्या फिती लावून, आपल्या गाड्यांना काळे झेंडे लावून निषेध व्यक्त करत आंदोलानात सहभागी व्हावे'' '' असे 'समृद्ध कोकण संघटने'चे संस्थापक संजय यादवराव यांनी आवाहन केलंय. ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान 'कोकण महामार्ग जनजागृती अभियाना'चे आयोजन करण्यात आले असून महामार्गाची दुरावस्था, खड्डे यामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहिली जाईल.
● काय आहेत मागण्या?
★जाहीर केल्याप्रमाणे पुढील एक वर्षात दर्जेदार आणि खड्डेमुक्त महामार्ग पूर्ण व्हावा.
★ शाळा, गावे अशा ठिकाणी अंडरपासची सोय करावी.
★अपघातासाठी कारणीभूत असणारी धोकादायक वळणे, घाट शक्य तितके सोपे करावेत.
★जेएनपीटी, दिघी, औद्योगिक पट्टा असणाऱ्या पनवेल ते माणगाव या रस्त्याला सहापदरी करत संपूर्ण सिमेंट रस्ता बनवावा, संपूर्ण सर्व्हिस रोड असावा.
★महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये.
★ डोंगर पोखरण्याऐवजी भरावासाठी नदीतील गाळ महामार्गाच्या कामासाठी वापरावा.
★महामार्गावर विविध झाडे लावत हा देशातील सुंदर ग्रीन हायवे बनवावा.
★ दर २५ किलोमीटरवर शेतकरी बाजाराची सुविधा करावी.
●आंदोलन कधी आणि कुठे ?
◆ ५ सप्टेंबर स. १० ते दु. १२ - पोलादपूर, चोळई ते लोहारमाळ
◆ ६ सप्टेंबर स. १० ते दु. १२ - संगमेश्वर एसटी स्टॅण्ड समोर
◆ ७ सप्टेंबर स. १० ते दु. १२ - पनवेल- पळस्पे ते शिरढोण
◆७ सप्टेंबर स. १० ते दु. १२- चिपळूण - बहादूरशेख नाका ते पाग नाका
◆ ८ सप्टेंबर स. १० ते दु. १२- सिंधुदुर्ग - नांदगाव तिठा ते ओटव फाटा